मंगरूळपीर (ता. ९ एप्रिल):
शहरातील लाईटबंदीच्या अंधारावर अखेर गांधीगिरीच्या उजेडाने विजय मिळवला! नगरसेवक अनिल विठ्ठलराव गावंडे (भाजपा) यांच्या तीव्र आंदोलनाच्या इशाऱ्याने प्रशासनाला जाग आली असून, आंबेडकर चौक ते शेलगाव फाटा या मुख्य रस्त्यावर लाईट सेवा आज पुन्हा सुरू झाली आहे.
गेल्या १२ दिवसांपासून रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य होते, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. १४ एप्रिल रोजी होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर या लाईट्सचा प्रश्न अत्यंत गंभीर ठरत होता.
या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक गावंडे यांनी मशाल आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यांच्या या लोकहितवादी भूमिकेची दखल घेत लोकप्रिय आमदार श्याम भाऊ खोडे यांनी आंदोलनाला उघड पाठिंबा दिला. त्यांनी संबंधित विभागाशी चर्चा करून तत्काळ कारवाईसाठी आग्रह धरला.
गावंडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, "हा लढा जनतेसाठी होता. शांततेच्या मार्गानेही अन्यायाविरुद्ध यश मिळवता येतं, हे आम्ही दाखवून दिलं."
प्रशासनाच्या तत्परतेनंतर नगरपरिषदेचे अधिकारी आणि आमदार खोडेंचे गावंडे यांनी आभार मानले. आता रस्त्यावर पुन्हा रोषणाई आल्याने नागरिकांचा उत्साह वाढला असून, आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी संपूर्ण शहर सज्ज आहे.
"गांधीगिरीच्या मशालीने अंधाराचा अंत!" – हीच आहे मंगरूळपीरकरांची विजयी हाक!
0 Comments