अजित पवारांच्या बंडानंतर प्रचंड उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याच्या राजकारणातील भूकंपानंतर आता जवळपास सर्वच समीकरणं बदलल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आज महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक झाली तर निकाल काय लागतील आणि जनतेचा कौल कोणाला मिळेल? हे प्रश्न आतापासूनच सर्वसामान्यांमध्ये चर्चेत आहेत.
देशात लोकसभेच्या निवडणुका पुढील वर्षी 2024 मध्ये होणार असल्या तरी, महाराष्ट्रात अद्याप निवडणुकीचे बिगुल वाजलेले नाही. निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात एक सर्वेक्षण केलं आहे. आज लोकसभा निवडणूक झाली तर कोणत्या पक्षाला किती मताधिक्य मिळेल? हा प्रश्न सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांना विचारण्यात आला. दरम्यान, या सर्वेक्षणाचे आश्चर्यकारक निष्कर्ष समोर आले आहेत.
कोणत्या पक्षाला किती मतं?
सर्वेक्षणानुसार, आज महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक झाली तर भाजपच्या (BJP) पारड्यात जरा जास्त मताधिक्य पडले. सर्वेक्षणात भाजपला 43.10 टक्के तर महाविकास आघाडीला 42.10 टक्के मतं मिळाली आहेत. इतरांबद्दल बोलायचं झालं तर त्यांची मतांची टक्केवारी 14.80 टक्के आहे. महाविकास आघाडीच्या मतांच्या तुलनेत महाराष्ट्रात भाजपचं मताधिक्य पुढे असल्याचं सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे, परंतु संख्याबळ पाहता महाविकास आघाडी भाजपच्या तुलनेत फारशी मागे नाही. महाविकास आघाडीच्या मतांचा वाटा भाजपपेक्षा फक्त एक टक्का कमी आहे.
कोणत्या पक्षाला किती टक्के मतं?
भाजपची मतांची टक्केवारी : 43.10 टक्के
महाविकास आघाडीची मते : 42.10 टक्के
इतरांच्या मतांचा वाटा : 14.80 टक्के
निवडणुकीपूर्वी नेतेमंडळी सज्ज
2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं आतापासूनच तयारी सुरू केली आहे. भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वानं प्रादेशिक युनिट्सची एक मोठी संघटनात्मक पुनर्रचना सुरू केली आहे, ज्याकडे 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी एक महत्त्वाचं पाऊल म्हणून पाहिलं जात आहे. संघटनात्मक बदलांमध्ये तेलंगणा, पंजाब आणि झारखंडचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी, सुनील जाखर आणि बाबुलाल मरांडी यांची नावं समाविष्ट आहेत.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत काय होतं चित्र?
भाजपची लाट देशातील काही राज्यांतून ओसरताना दिसत आहे. यावेळी बिहार, कर्नाटक आणि महाराष्ट्रात भाजपचा प्रभाव कमी झाल्याचं पाहायला मिळालं. ही तिनही तिच राज्य आहेत, जिथे 2019 च्या निवडणुकीत भाजपनं एकतर्फी विजय मिळवला होता. 2019 मध्ये भाजप, एलजेपी आणि जेडीयूनं बिहारमध्ये 40 पैकी 39 जागा जिंकल्या होत्या. परंतु, आता जेडीयूननं भाजपची साथ सोडली आणि भाजपनं बिहारमधील सत्ता गमावली. कर्नाटकात 28 पैकी 25 जागा भाजपनं जिंकल्या, तर एक जागा त्यांच्या समर्थक उमेदवारांच्या वाट्याला गेली, परंतु कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला काँग्रेसकडून दारूण पराभवाचा सामना करावा लागला.
0 Comments