Ticker

6/recent/ticker-posts

संभाजी ब्रिगेडने केली कंत्राटी पदभरती शासन निर्णयाची होळी


मंगरुळपीर (दि.२८): महाराष्ट्रात कंत्राटी पद्धतीने विविध कार्यालयातील पदभरतीबाबतचा शासन निर्णय मागे घ्यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड, मंगरुळपीरच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात कंत्राटी पदभरती शासन निर्णयाची होळी करुन संभाजी ब्रिगेडच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.

सदर निवेदनात असे म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी व अग्रेसर राज्य म्हणून भारतात प्रसिद्ध आहे परंतु गेले काही दिवस आपण महाराष्ट्राच्या नावारूपास काळीमा फासणारे अनेक निर्णय शासनाने घेतले आहेत. त्यातीलच एक निर्णय म्हणजे दिनांक १४ मार्च २०२३ रोजी काढलेला कंत्राटी पद्धतीने पदभरती सुरु करणारा शासन निर्णय होय.

गेली अनेक वर्ष प्रशासनातील विविध विभागातील अनेक पदे न भरल्यामुळे बेरोजगारीचा प्रचंड मोठा उद्रेक महाराष्ट्रामध्ये आधीच उसळलेला आहे. एकीकडे विद्यार्थ्यांना मेगाभरतीच्या नावाखाली गाजर दाखवण्याचा प्रकार होत असताना दुसरीकडे शासन अशा पद्धतीचे शासन निर्णय काढून महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांची एक प्रकारे थट्टाच करत आहे.

अस्मानी आणि शासकीय संकटाला सामोरे जाणारा शेतकरी  बाप आधीच अडचणीत असताना दुसरीकडे शेतकरी पुत्रांच्या हक्काच्या रोजगाराच्या संधी देखील वरील निर्णयाच्यामुळे शासन काढून घेत आहेत. शासनाने काढलेला जीआर म्हणजे महाराष्ट्रातील शासकीय नोकऱ्या संपवण्याची नांदीच आहे असे आम्हास वाटते. या शासनाच्या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांमध्ये प्रचंड मोठी अस्वस्थता पसरली असून शासनाच्या विरोधात तीव्र नाराजी निर्माण होत आहे. कदाचित ही नाराजी रस्त्यावर आल्यास महाराष्ट्रात अराजकता निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणाईच्या जनभावना लक्षात घेऊन शासनाने दिनांक १४ मार्च २०२३ रोजी काढलेला कंत्राटी पद्धतीवरच्या पदभरतीचा शासन निर्णय तात्काळ रद्द करून महाराष्ट्रातील विविध विभागात रिक्त असलेली पदे एमपीएससीच्या माध्यमातून भरण्यासाठी प्रयत्न करावे. अन्यथा बेरोजगारांची एक मोठी फौज रस्त्यावर उतरेल व त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न यासाठी आपण व शासन जबाबदार राहील असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष रमेश मुंजे, तालुकाध्यक्ष अजय गवारगुरु, तालुका प्रवक्ता शिवाजी गजभार, तालुका उपाध्यक्ष योगेश ठाकरे, तालुका कार्याध्यक्ष हरीश गव्हाणे,  समाधान भगत, वसंता मोरे, अजय वाणी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments